Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ‘हे’ नवे निर्बंध लागू होणार

महाराष्ट्रातील वाढती करोना संसर्गाची स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

0

महाराष्ट्रात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन संसर्गाचीवाढती स्थिती पाहता राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या आदेशात सरकारने ओमायक्रॉनचा संसर्ग पाहता काही नवे निर्बंध लागू होत असल्याचं नमूद केलं आहे. या आदेशानुसार १० जानेवारीपासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत. यात लग्ना समारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लावण्यात आले आहेत.

कोणते निर्बंध लागू?

१. पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.

२. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.

३. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी.

४. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार.

५. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.

६. शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार.

७. जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार.

८. केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील.

ओमायक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठीच्या नियमावलीत बदल

जगभरात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना भारतात देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार परदेशातून, विशेषत: ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांच्या यादीत समाविष्ट देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्याहोम क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्हि किंवा निगेटिव्ह आल्यास पुढील कार्यवाहीच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे.

सर्व प्रवाशांना ७ दिवसांचे गृह विलगीकरण!

केंद्राने जारी केलेल्या नियमावलीनुसार, आता भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे हे प्रवासी ओमायक्रॉनबाधित देशांच्या यादीत असो किंवा नसो, त्या सगळ्यांना ७ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावाच लागणार आहे. केंद्राने जारी केलेली नवी नियमावली येत्या ११ जानेवारीपासून अर्थात मंगळवारपासून लागू होणार आहे.

ओमायक्रॉनबाधित देशांमधील प्रवासी

दरम्यान, ज्या देशांचा समावेश भारतानं ओमायक्रॉन देशांच्या यादीमध्ये केला आहे, अशा देशांमधील प्रवाशांना भारतातील कोणत्याही विमानतळावर उतरल्यानंतर तिथे करोनाची चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विमान कंपनीला माहिती द्यायची आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली, तरी त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. मात्र, जर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.